प्रजासत्ताक दिनानिमीत्त खास 'तिरंगी मेजवानी'
6 minuteRead
हिवाळ्यात भरपूर भूक लागते आणि खाल्लेलं चांगल पचते. खवय्येगिरीला थंडीत चांगलाच वाव मिळतो. संक्रातीसाठी छान छान पदार्थांचे बेत केल्यानंतर तुम्ही प्रजासत्ताक दिनानिमित्त काही खास रेसिपी ठरवली असेलच. तुमच्या मनात तिरंगी मेजवानीचा बेत करायचा असा विचार करत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी घेवून आला आहोत 'तिरंगी पुलाव'. तेव्हा आता फक्त प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देवून थांबू नका तर आपल्या आवडीच्या व्यक्तीं-बरोबर खास रेसिपीसह लोकशाहीचे पर्व साजरे करा.
'तिरंगी पुलाव'ची रेसिपी जाणून घेण्याआधी पाहूया पुलावचा इतिहास ! मध्य पूर्व देशातून पुलाव जगातील विविध देशात पोहोचला. पुलाव हा शब्द 'पिलाफ' किंवा 'पल्लाओ' या शब्दातून आलेला आहे.ईराणी विद्वान अविसेना यांच्या पुस्तकात पुलावचा उल्लेख सापडतो त्यामुळे ईराणींना पुलावचं श्रेय दिलं जातं.तसे पाहिले तर याज्ञवलक्य स्मृतिमध्ये तसेत सहाव्या शतकात तमिळ साहित्यात पुलाव सारख्या व्यंजनाचा उल्लेख केलेला सापडतो. मुघल साम्राज्यात तांदूळ वेगवेगळ्या पद्धतीने शिजवले जात होते.आइन-ए-अकबरी पुस्तकात देखील आपल्याला पुलाव पहायला मिळेल. १६ व्या शतकात मुघल साम्राज्यात भयानक दुष्काळ पडला. शहेनशाह अकबराने बाहेरून अन्न-धान्य मागवले. शहरात रस्ते-बांधणीचं आणि तटबंदी बांधणीचं काम सुरु केलं. जो कामाला येईल, त्याला त्या दिवसाचा किराणामाल राजाकडून मिळत होता. कामगार काय करायचे जो काही किराणामाल मिळायचा तो भातासह एकत्र शिजवायचे त्यातून 'पुलाव'चा जन्म झाला.
आता पाहूया सौ. मीरा महाजनी यांनी सांगितलेला 'तिरंगी पुलाव' कसा तयार करायचा.
साहित्य
3 वाटी बासमती भात
एक वाटी पालक प्युरी
एक वाटी टोमॅटो प्युरी
अर्धा वाटी किसलेला गाजर
2 चमचे आले-लसूण पेस्ट
एक चमचा तिखट
पाच ते सात काजूचे तुकडे
एक चमचा जिरे
4 चमचे तूप
स्वादानूसार मीठ
कृती
1. छोटी तीन वाटी बासमती तांदूळ पंधरा मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे भात शिजवून घ्या. या भाताचे एका वाटीने तीन भाग करा.
2. पालक प्युरीसाठी गरम पाण्यात पालक आणि थोडं मीठ घालून अगदी पाच मिनिटे शिजवून घ्या. शिजलेला पालक मिक्सरमधून काढून एका वाटीत पालक प्युरी काढून घ्या.
3. टोमॅटो प्युरीसाठी गरम पाण्यात अख्खे टोमॅटो अगदी पाच मिनिटे शिजवून घ्या.टोमॅटोची साले काढून मिक्सरमधून फिरवून घ्या. आपली टोमॅटो प्युरी तयार आहे.
4. गॅस मंद आचेवर ठेवून त्यावर कढई ठेवा. कढई तापली की त्यात एक चमचा तूप घालून काजू परतून घ्या आणि बाजूला काढून ठेवा.
5. आता त्याच कढईत पुन्हा एक चमचा तूप घाला. त्यानंतर भाताचा एक भाग घालून परतून घ्या. चवीनुसार मीठ घाला आणि एका वाटीत काढून ठेवा.
6. आता त्या कढईत पुन्हा एक चमचा तूप घाला त्यात लाल तिखट घाला आणि थोड्यावेळाने गाजराचा किस घाला. छान परतून घ्या. साधारण पाच ते सात मिनिटांनंतर त्यात टोमॅटो प्युरी घाला. सगळं छान परतून घ्या.
7. पुलावसाठी टोमॅटो प्युरी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जायला हवा. त्यासाठी कढईतील मिश्रण दहा मिनीटे मंद आचेवर शिजू द्या. त्यानंतर त्यात भात घाला आणि चवीनुसार मीठ घालून परतून घ्या. टोमॅटोमुळे भाताला छान केशरी रंग येईल शिवाय गाजराची पौष्टिकता आपल्याला मिळेल. आता हा केशरी रंगाचा भात एका वाटीत काढून ठेवा.
8. गॅसवर कढई ठेवून त्यात एक चमचा तूप घाला. तूप गरम झाले की जिरे घाला. त्यानंतर आलं- लसूण पेस्ट घाला.
9. थोड्यावेळाने पालक प्युरी त्यात घाला. पाच मिनीटे प्युरी शिजू द्या. आता भात आणि चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा लिंबाचा रस घाला. आपला हिरव्या रंगाचा भात तयार आहे.
10. आता प्रत्येकी तीन वाट्यांमध्ये केशरी,पांढरा आणि हिरव्या रंगाचा भात ठेवा. तळलेले काजू घेवून या.
11. आता सजावट करताना प्लेटमध्ये केशरी भात नंतर पांढरा रंगाचा भात आणि त्यानंतर हिरवा भात एका खाली एक असे ठेवा.आपण जे काजू तळले होते त्याचा उपयोग अशोकचक्राप्रमाणे करा.अशा प्रकारे अगदी झटपट आणि कोणताही कृत्रीम रंग न वापरता आपला तिरंगी पुलाव तयार आहे.
यंदाच्या प्रजासत्ताक दिनी नक्की घरी तयार करा 'तिरंगी पुलाव'. घरी सगळेजण तुमचे कौतुक करतील यात शंकाच नाही. तुमचा 'तिरंगी पुलाव' कसा झाला ते आम्हाला कळवायला विसरू नका.
अनिता किंदळेकर
Write, Record and Answer! Consume Unlimited Content! All you need to do is sign in and its absolutely free!
Continue with one click!!By signing up, you agree to our Terms and Conditions and Privacy Policy.